पोळा

 सुलहर "सहर्ष सादर करत आहे 
* विचार मंथन* 

               🌷 बैल पोळा🌷

“अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला…कृषीवल  आनंदाने, सजवितो हो बैलाला”

शेतकऱ्यांचा खास सण बैल पोळा
कसा साजरा करतात बैलपोळा 
मराठी कालदर्शिका प्रमाणे श्रावण महिन्याच्या अमावस्येला पिठोरी अमावस्या, ‘बैलपोळा’ पण म्हणतात .श्रावण महिना व्रतवैकल्य आणि सणांची  धूम धाम असते.  या काळात नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी पाठोपाठ येतो तो ‘बैलपोळा’. याच ऋतूत निसर्गही खूप फुललेला असतो .आणि जिकडे तिकडे सुंदर हिरवळ असते जणू "धरती मातेने "हिरवा शालू पांघरलेला आहे तिचे स्वागत प्रत्येक सणाला  होते व रंगीबेरंगी फुलांनी नटते .हा सण संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी बांधव आनंदाने, उत्साहाने साजरा करतात ग्रामीण भाग (खानदेशात) हा पूर्ण शेतीप्रधान देश आहे त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात शेतकरी हा सण साजरा करता. मुंबईसारख्या अनेक शहरी भाग सोडले तर सगळीकडे साजरा होतो .
बैल म्हणजे शेतकऱ्यांचे जिवाभावाचे मित्र त्यांच्या जीवावर शेतकरी शेत नांगरून जमिनीतून धान्य पिकवतो बैल शेतात रात्रंदिवस राहुन कष्ट करतात . बैलगाडीला एक बैलांची जोडी असते बैलांच्या रंग एक पांढरा एक काळा किंवा दोघी पांढरी किंवा दोघी ब्राऊन अशी खिल्लारी बैलांची जोडी जोडलेली असते .खूप छान दिसते बैलगाडी याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण खास पद्धतीने साजरा केला जातो. दिवाळी-दसरा प्रमाणे शेतकरी या सणाची आतुरतेने वाट बघत असतो .कर्नाटकात याला बेंदूर असे म्हणतात. तिथे खूप वेगळ्या पद्धतीने  उत्साहात साजरा करताना दिसतात. जगात आता शेती आधुनिक पद्धतीने करतात ,नांगरतात तरी पण त्यादिवशी बैलाचा  तितकाच मान असतो  ह्या एकच दिवस बैलांनी कडून श्रमाचे काम करून घेत नाही बैलांना विश्रांती देतात .खूप काळजी घेऊन नदीवर नेऊन तुप हळद लावून आंघोळ घालतात पूजा करतात.
खूप सजवतात रंगीबेरंगी दोरे नाकात नथनी अंगावर रंग लावून  चित्र काढतात त्या वर छान स्लोगन लिहितात. अंगावर भारी झूल टाकतात सुंदर भरतकाम विणकाम, आरसे लावलेली अशी सुंदर झुल असते  त्यांना पोटभर जेवायला देतात. त्या दिवशी बैलांना रीतसर आमंत्रण देतात उद्या तुम्हाला आपल्याकडे जेवायला यायचे आहे . त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून पूजा करतात . कधीकधी त्या दिवशी बैलांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात 
ज्या शेतकरी लोकांकडे बैल नसेल ते लोक लाकडी बैलगाडी किंवा मातीचे छोटे,मोठे बैल आणून पूजा करतात .कुंभार लोक मातीचे बैल खूप सुंदर बनवतात .काही श्रीमंत घरांमध्ये बैलांच्या गळ्यात घुंगुर माळा, घंटा आणि पायात ऐपतीप्रमाणे तोडे घालतात .संध्याकाळी पोळा फुटतो .म्हणजे सर्व बैल एकत्र येऊन गावाच्या वेशीवर त्यांची मिरवणूक आल्यानंतर त्यांच्यात चढाओढ लागते कि कोणता बैल अधिक चांगला सजला . त्यादिवशी सीमेवर आणि घरोघरी आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते वाजंत्री ढोल ताशा सह भव्य मिरवणूक काढली जाते गावातील मानाचा जो व्यक्ती असेल तो गावाच्या सीमेवर तोरण तोडतो ग्रामपंचायत तर्फे मानाची शाल देतात व बैलाच्या मालकाच्या  डोक्यावर फेटा बांधला जातो.
त्याला पोळा फुटला असे म्हणतात. यांची शर्यत पण लावतात व जो  बैल शर्यती पहिला येईल त्याला शाल नारळ काही रुपये देऊन त्याच्या मालकाचे सत्कार करतात गावाच्या सीमेवर बाहेर  गावातील लोक हा उत्सव बघण्यास सज्ज असतात. 
मी लहान असताना आमच्याकडे आमची आई आदल्या दिवशी कुंभाराकडून छोटे छोटे लहान पाच बैल घ्यायची त्यांना गेरू पाण्यात भिजवून त्याचा रंग सर्व बैलांना लावायची व वाळल्यावर त्यावर चुन्याचे पांढरे ठिपके ठेवायचे खूप सुंदर दिसायचे मग पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवायची त्यांना लाईन शीर उभे करायचे  त्यांना शेंगोळे घालायचे ते म्हणजे कणकेत गूळ घालून गोल रिंग सारखे बनवायचे व ते  शिंगा मध्ये 2- 2 असे घालायची पाच पुऱ्या त्यावर पाच दिवे आणि नैवेद्याला पूर्ण पुरणाचा स्वयंपाक असा बेत असायचा .पहिले बैलांसाठी नैवेद्य काढायचा दुपारून आमच्या गल्लीत  शेतकऱ्यांचे मुलं बैल घेऊन यायचे त्यांना  तो नैवेद्य द्यायचा त्याची पूजा करायची नारळ व काही रुपये देऊन त्यांना गहू, ज्वारी खाऊ घालायचे  खूप मजा यायची त्यां दिवसभर घंटेच्या आवाजाने गल्ली दणाणून जायची एक बैलजोडी गेली कि दुसरी दुसरी गेली की तीसरी येतच राहीची बैल कसे सजवले ते सर्वजण एकत्र येऊन  बघायचे देवा जवळचे बैलपूजा दिवसभर  ठेवायची व दुसऱ्या दिवशी ते बैल तुळसीच्या कुंडीत विसर्जन करायचे . लहान मुलं असतील ते खेळतात. कुठे-कुठे वर्षभर ती बैलाची जोडी ठेवतात व दुसर्‍या वर्षी नवीन बैल आणतात. तसेच श्रावण महिन्यात प्रत्येक दिवस व वार सणाचा च असतो .

तसेच एक अजून महत्त्वाचे म्हणजे त्या दिवशी सोनार समाजात कारागीर यांकडे सर्व अवजारांची व बागेश्वरी पूजा करतात म्हणजे आपल्या दगडी कोळशाच्या शेगडी प्रमाणे असते पण त्यात पुर्ण राख भरलेली असते व त्यावर 7 चौकोनी मातीचे विशिष्ट पद्धतीने ठोकळे बनवलेली असतात त्याला पडघम म्हणतात याचा उपयोग सोन आटवण्यासाठी व सोन शुद्ध करण्यासाठी वापरतात शेगडी लाकडी कोळसा टाकून त्याचा विस्तव बनवून तयार केलेले असते व त्याच्यामध्ये  एक विशिष्ट मातीच्या छोट्या वाटी सारखे मुस या नावाचं एक भांड असतं असते  त्याच्यात सोन वितळतात हे सर्व पोळ्याच्या आदल्या दिवशी करून त्याला गेरूचा कलर देतात व त्याला पांढरे ठिपके देतात व पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी पुरणाचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा करतात. वरती फोटो दिलेला आहे

 यादिवशी कृष्णाला यशोदा मैया ने वाण दिले होती तेव्हापासून आपल्याकडेही ही प्रथा आहे
 आई मुलाला वाण देते :-
त्याची अशी पद्धत आहे की त्या दिवशी गव्हल्याची खीर व गोड पुरी गोड दिवा करतात. पुरीवर दिवा ठेवून  देवाजवळ लावायचा व पाच पदरी दोऱ्याचे पिवळे सूत करून ते देवाजवळ वाण ठेवून दिवा लावतात. सुत घेऊन आई विचारते अतिथी कोण आहे असे तीन वेळा बोलते मागे मुलगा मागे उभा असतो  तिसऱ्या वेळी तो मुलगा मी आहे असे म्हणतो. मग आई  ते सुत आपल्या डोक्यावरून मागे टाकते मुलगा ते झेलतो. खिरपुरी दिवा याचे वाण मुलाच्या हातात देतात व दोरा उजव्या हाता च्या मनगटाला बांधतात अशी पण एक प्रथा आहे हिंदू धर्मात

मी वाचलेली बैलपोळा कथा:-
बैलपोळ्याविषयी एक दंतकथा प्रचलित आहे. असं म्हणतात की, कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाट खेळत होते. सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले. हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरले. शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा  साक्षीदार होता तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला ? त्यावेळी भगवान शंकराचा परम भक्त नंदीने शंकराची बाजू घेतली. नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला. कलयुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला. नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली. तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला   सांगितले की तुला कलयुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत. तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला. बैलपोळ्याची कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे. निसर्गातील प्रत्येक वृक्ष, वेली, प्राणी, डोंगर, नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे. ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते अशी आख्यायिका आहे.

हा सण यावर्षी करोना मुळे  सामूहिक रीत्या साजरा होणार नाही त्यामुळे बैलांची मिरवणूक न काढता घरासमोरच पूजा करावी लागली आहे असे वाटते.




Comments

  1. उत्तमरीत्या साजऱ्या होणाऱ्या पोळ्याचे लेखन वाचले.लेखन परिपूर्ण असून पर्यावरणाचा विचार ठेऊन केलेले उत्कृष्ठ आहे.अललंकर घडणाऱ्या सुवरणकरांचेही योग्य स्पष्टीकरण आहे.शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्वाचा भाग असलेला ऋण फेडण्यारा उत्सव योग्य शब्द बद्ध झाल्याने आपले मनस्वी अभिनंदन....अरुण चौधरी

    ReplyDelete
  2. Very nice 👌👌.Amarnath Jangale.

    ReplyDelete
  3. खुप खुप धन्यवाद आपला
    🙏🌷अभिप्राय बद्दल

    ReplyDelete
  4. नमस्कार 🙏दादा खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"